सुशांत सिंगच्या जाण्यानंतर पवित्र रीश्ता या मालिकेचा सिकवल यावा अशी मागणी प्रेक्षकांकडून केली जात होती. त्यावर मालिकेत नेमके कोणकोणते कलाकार असतील यावर देखील आता शिक्कामोर्तब केला जात आहे. अर्थात मालिकेत अर्चनाची भूमिका अभिनेत्री अंकिता लोखंडे साकारणार हे पक्के ठरले असले तरी मानव च्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. कारण मानव ची भूमिका सुरुवातीला सुशांतने चांगलीच वठवलेली पाहायला मिळाली होती. मानव आणि अर्चना यांची प्रेमकहाणी प्रेक्षकांना खूपच भावली होती. मात्र त्यानंतर मानव ची ही भूमिका हितेन तेजवानीकडे आली. खरं तर मालिका लीप घेणार असल्याने सुशांतला या मालिकेत वडिलांची भूमिका मुळीच करायची नव्हती.
करिअरच्या सुरुवातीलाच वडिलांची भूमिका ही बाब त्याच्या करिअरच्या दृष्टीने त्याला न पचणारी होती. याच कारणास्तव हितेनकडे मानव ची भूमिका देण्यात आली होती. पवित्र रीश्ता या मालिकेत बरेचसे मराठी कलाकार झळकले होते. अगदी प्रिया मराठे, उषा, नाडकर्णी, प्रार्थना बेहरे, सविता प्रभुणे, स्मिता ओक, अजय वाढवकर, किशोर महाबोले यांना या मालिकेतून लोकप्रियता मिळाली होती. परंतु पवित्र रीश्ता च्या दुसऱ्या सिजनमध्ये हे मराठी कलाकार पुन्हा एकदा पाहायला मिळणार का हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे. उषा नाडकर्णी यांनी सुरक्षेच्या कारणास्तव नव्या मालिकेत काम करण्याचेच टाळले आहे. त्यामुळे त्या ह्या मालिकेत नसणार हे स्पष्ट झाले आहे. आता राहता राहिला प्रश्न तो मानवच्या भूमिकेचा. तर पवित्र रीश्ताच्या या दुसऱ्या सिजनमध्ये मानवची भूमिका अभिनेता “शाहिर शेख” साकारणार असल्याचे नुकतेच स्पष्ट झाले आहे. शाहीर शेख हा हिंदी मालिका अभिनेता आहे. क्या मस्त है लाईफ, बेस्ट ऑफ लक नीक्की, महाभारत, कुछ रंग प्यार के ऐसे भी अशा अनेक हिंदी मालिका त्याने अभिनित केल्या आहेत.
महाभारत मालिकेत त्याने साकारलेला अर्जुन खूपच भाव खाऊन गेला होता. सुरुवातीला शाहिरने मॉडेलिंग क्षेत्रात आपला जम बसवला होता. बॉलिवूड तसेच हिंदी मालिका अभिनेत्री रुचिका कपूर ही शाहीर शेखची पत्नी आहे. जवळपास दीड वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांनी लग्न केले होते. पवित्र रीश्ताच्या दुसऱ्या सिजनमध्ये मानवच्या भूमिकेत शाहीर शेख योग्य असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. सुशांतचा आणि शाहिरचा लूक मानवच्या भूमिकेसाठी सेम लूक आहे असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे आणि तो ही भूमिका तितक्याच नेटाने सांभाळेल अशीही आशा व्यक्त केली जात आहे. फक्त येणारा हा दुसरा सिजन प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार आहे याबाबत अजूनही प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण कलाकारांच्या निवडीलाच एवढा वेळ लागत असल्याने गेल्या वर्षभरापासून प्रतीक्षेत असलेली ही मालिका कलाकारांच्या निवडीमध्ये अजूनही व्यस्त असलेली दिसते. तुर्तास या मालिकेला लवकरात लवकर मुहूर्त मिळो हीच सदिच्छा…