
शिवाजी महाराज आणि तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे आदी मावळ्यांची शौर्यगाथा मराठी मनासाठी नवी नाही. किंबहुना याच शौर्याच्या गोष्टी ऐकत महाराष्ट्रातला प्रत्येकजण मोठा झाला आहे. यात तानाजी मालुसरे आणि ‘गड आला पण सिंह गेला’ हे शिवरायांचे उद्गार प्रत्येक मराठी मनावर कोरले गेले आहेत. कोंढाण्याची हीच लढाई दिग्दर्शक ओम राऊत यांनी पडद्यावर आणली आहे. अजय देवगण, शरद केळकर, सैफ अली खान, काजोल यांसह देवदत्त नागे, शशांक शेंडे आदी अनेक मराठी कलाकारांची फळी या सिनेमात आहेत.
ही गोष्ट नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शौर्याची आहे. कोंढाणा काबीज करण्यासाठी आपल्या घरातलं लग्न लांबणीवर टाकणारे, शिवरायांच्या शब्दासाठी, स्वराज्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी असणारे लढवय्ये तानाजी मालुसरे युद्धकलेत निपुण होतेच पण डाव प्रतिडाव आखण्यातही तरबेज होते. या सिनेमातून ते दिसतं. उच्च तांत्रिक मूल्य, पकड घेणारे युद्धाची दृश्य आणि ऐन युद्धात दिग्दर्शकाने दाखवलेली कल्पकता वाखाणण्यासारखी आहे. विशेषत: उदयभानने केलेली मराठा सैन्याची फसगत. कोंढाण्यावर चढाई करण्यासाठी वापरलेले बांबू. आदी अनेक गोष्टी पारणं फेडतात. सिनेमाचा शेवटही थरारक आणि अभिमानाने मराठी मन अधिक उंच करणारा. चित्रपट पकड घेतो.. व्यक्तिरेखा अधोरेखित करतो.
या चित्रपटाच्या निमित्ताने शिवराय, नरवीर तानाजी मालुसरे यांचा पराक्रम देशभरात पोहोचेल यात शंका नाही. पण हा सिनेमा पाहताना किंतु परंतु उद्भवतात ते सिनेमॅटिक लिबर्टी समोर आल्यानंतर. चित्रपटात तानाजी मालुसरे उदयभानला पाहण्यासाठी कोढाण्यावर जातात असं दाखवण्यात आलं आहे. तो सगळा सिक्वेन्स सिनेमॅटिक झाला आहे. तितकीच बाब खटकते ती कोढाण्यावर शंकराच्या गाण्यावर ताल धरलेले तानाजी पाहिल्यानंतर. याशिवाय, शेवटी येणारं गाणंही जरा खटकणारं. पण मग मुद्दा कमर्शिअल सिनेमाचा येतो. म्हणजे, इतर हिंदी दिग्दर्शकांनी अशी लिबर्टी घेतलेले सिनेमे लोकांनी डोक्यावर घेतलेच. पण इथे का घेऊ नये, असा प्रश्न पडणंही स्वाभाविक आहे. पण ही घेलेली लिबर्टी पचवणं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सिनेमाच्या ट्रेलरमुळे यापूर्वीच चित्रपटातले संवाद गाजताहेत. शिवाय, अॅक्शनही आहेच.