चोरीचा मामला, फुंक, वेलकम जिंदगी, राजी सत्यमेव जयते, मलंग अशा चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपट सृष्टीसोबतच बॉलिवूड चित्रपट सृष्टीतही अभिनेत्री अमृता खानविलकरने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. नटरंगमधील उत्कृष्ट लावणी नृत्यासोबतच नच बलीयेच्या मांचारही तिने आपल्या नृत्याची झलक दाखवून दिली. अमृता खानविलकर हिंदी मालिका तसेच टीव्ही अभिनेता हिमांशू मल्होत्रासोबत विवाहबद्ध झाली. परंतु गेल्या कित्येक दिवसांपासून अमृता मुंबईत तर हिमांशू दिल्लीत राहत आहेत. नुकत्याच झालेल्या करवा चौथचे औचित्य साधून अमृता आणि हिमांशू आपल्या इंस्टाग्रामवरून लाईव्ह आलेले पाहायला मिळाले. यावेळी दोघांनीही आपल्या नात्यातील गमतीजमती चाहत्यांसोबत शेअर केल्या.

“तुम्ही वेगळे का राहता?” या एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावर अमृता आणि हिमांशूने उत्तर दिलेले पाहायला मिळाले. ‘मी कामानिमित्त मुंबईत आहे अगदी दिवळीतही मी पूर्णपणे बिझी असून केवळ एकच दिवस मी सुट्टी घेतली आहे. तर हिमांशू त्याच्या आईला भेटायला दिल्लीला गेला आहे.’ चाहत्याला दिलेल्या या उत्तरासोबतच हिमांशूने २००४ साली पहिल्यांदा अमृताची भेट कशी झाली याचीही आठवण करून दिली. आम्ही दोघे एकमेकांना गेल्या १६ वर्षांपासून ओळखत आहोत. डबु रत्नानी यांच्या ऑफिसमध्ये पहिल्यांदा आम्ही दोघे भेटलो होतो तिथेच सिध्दार्थने आमची ओळख करून दिली. आमच्या दोघांमध्ये आजही भांडणं होतात असे म्हणत अमृताने सांगितले की हिमांशू खूप शांत तर मी खूपच मस्तीखोर आहे. मी त्याच्यासोबत कधीच काम करू शकत नाही अगदी दोन मिनिटंही मी त्याच्यासारखी शांत बसू शकत नाही. हिमांशू मल्होत्रा नेहमीच आपल्या इन्स्टाग्रामवरून चाहत्यांशी संवाद साधत असतो. आपल्या बोलण्यातून तो नेहमीच या चाहत्यांना प्रेरणा देताना दिसतो. चाहत्यांकडूनदेखील त्याला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतो. करवा चौथच्या निमित्ताने अमृता आणि हिमांशू दोघांनीही उपवास केला होता. मी अमृतासाठी दुसऱ्यांदा हा उपवास केला आहे तर अमृतालाही या प्रथेवर भयंकर श्रद्धा आहे आणि मी नेहमीच उपवास, देवदर्शन करते आणि मला ते खूप आवडतंही असे ती म्हणते. त्यामुळे हिमांशू आणि अमृता यांच्या नात्यात सारे काही आलबेल आहे असेच म्हणावे लागेल…